भाजपा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा कमळ चिन्हावर लढवणार ही काळ्या दगडावर कोरलेली रेघ
भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेनेला इशारा ; कमळ चिन्हावर निवडणूक लढत तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळेल

कणकवली – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जागा भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार आहे. तीन लाख पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होणार ही काळ्या दगडावरील कोरलेली रेघ आहे,ना.उदय सामंत यांनी ही जागा युती लढेल,मात्र भाजपाच्या लोकसभा प्रवास धोरणानुसार या मतदारसंघात कमळ या निशाणी वर जिंकलेला खासदार असेल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिला आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रवास योजना भारतीय जनता पार्टीने सुरू केली त्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली नव्हती. देशात १६० जागा या लोकसभा प्रवास मध्ये समाविष्ट आहेत ज्या भाजप एक किंवा दोन वेळा विजयी झालेल्या जागा आहेत.त्या जागा लढून विजयी होण्याचा संकल्प केला आहे आणि त्या दृष्टीने गेली पाच वर्षे आम्ही या मतदासंघात काम केले आहे.त्यामुळे ही लोकसभा भाजप युती मध्ये कमळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.तसेच येणाऱ्या सर्व निवडणुकीसाठी भाजप सज्ज असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले आहे.
खासदार विनायक राऊत यांनी २०१९ मध्ये युतीसोबत लढून विजयी होऊन सुद्धा युतीधर्म पाळला नाही. त्यामुळे विनायक राऊत यांनी युतीबाबत भाष्य करू नयेत.त्यामुळे “शिंक्याचे तुटेल आणी बोक्याचे फावेल” अस काही होणार नाही आणी त्या भ्रमात पण विनायक राऊत यांनी राहू नये. असा टोला राऊताना लगावला आहे. भाजप व शिवसेना जागावाटपाबाबत योग्य निर्णय घेतील. त्यामुळे विनायक राऊत आणि उगाचच आगीत तेल ओतण्याचे काम करू नये, असेही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सुनावले.



