आमदार डॉ मनीषा कायंदे यांच्या निधीतून डोंगरी मध्ये पाण्याच्या पंपांचे लोकार्पण, सुमारे एक हजार कुटुंबांना होणार लाभ!
मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – उमरखाडी , डोंगरी परिसरात राहणारे रहिवाशी कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे हैराण झालेले आहेत. प्रामुख्याने उमरखाडी गणेश चौक येथे पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत ८० च्या दशकात उभ्या राहिलेल्या या इमारतीमधील रहिवाश्यांना तर अनेक अडचणीना सामोरं जावं लागतं. म्हाडाने सुरुवातीला दिलेले पाण्याचे पंप मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त किंवा कमी क्षमतेने वापरात येत असल्यामुळे पाणी भरण्यात रहिवाशांना त्रास होत आहे. अनेक लोकप्रतिनिधींना विनंती करुन सुद्धा समस्येकडे लक्ष दिलेले नाही. नागरिकांनी शिवसेनेचे पदाधिकारी रुपेश पाटील यांच्या माध्यमातून विभागप्रमुख दिलीप नाईक यांच्याकडे या बाबत विवेदन दिले होते.
विभागप्रमखांनी नागरिकांची समस्या आमदार डॉ. मनीषा कायंदे शिवसेना सचिव/ प्रवक्ते यांना सांगितल्यानंतर त्यांनी पाणीपुरवठ्यामुळे सुधारणा करण्यासाठी इमारतीना पाण्याची पंप बसविण्यासाठी आमदार निधी उलब्ध करुन दिला.
काल डोंगरी येथे झालेल्या कार्यक्रमात सर्व पाण्याचे पंप लोकार्पण करण्यात आले. दोन दिवसात ते प्रत्येक इमारतींमध्ये लावण्यात येतील व त्यामुळे रहिवाशांना मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध होईल . या प्रकल्पामुळे सुमारे एक हजार कुटुंबीयांना थेट लाभ होणार आहे. आमदार मनीषा कायंदे यांनी दोन इमारतींना भेट दिली तेव्हा नागरिकांनी फटाके लावून त्यांचे औक्षण करून स्वागत केले व त्यांचा छोटेखानी सत्कार सुद्धा केला.
कार्यक्रमास दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख दिलीप नाईक तसेच विजय वाडकर , रुपेश पाटील, प्रिया पाटील, जितेंद्र भोईर, प्रभा पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.



