संघर्ष कथा ! हलाखीच्या परिस्थितीशी झगडत तिघी सख्ख्या बहिणी, एक भाऊ पोलिस सेवेत
जनार्दन येडगे - मुंबई प्रतिनिधी

मुंबई – गरिबी पाचवीलाच पुजलेली काम करेल तेव्हा चूल पेटायची.अशा परिस्थितीत घरात शिक्षणाचा कसलाही गंध नसताना हलाखीच्या परिस्थितीत वाट काढत एकाच कुटुंबातील तीन बहिणी आणि एक भाऊ पोलीस दलात भरती झाल्याने गावांमध्ये या कुटुंबाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
गाव, परिसरात कुटुंबाची झाली वेगळी ओळख
सोनाली अंकुश मोटे (पुणे ग्रामीण पोलीस), रूपाली अंकुश मोटे (अहमदनगर पोलीस), रोहिणी अंकुश मोटे (मुंबई शहर पोलीस) या तीन बहिणी मागील काही वर्षांपासून पोलीस खात्यात कार्यरत आहेत त्यांचे धाकटे बंधू ज्ञानेश्वर अंकुश मोटे हे देखील नुकतेच पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाले आहेत यातील रूपाली मोटे या श्रीगोंदा पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत घरची परिस्थिती बेताचीच होती. कुठलेही मार्गदर्शन नसताना हालाखीची परिस्थिती वाट काढत या भावंडांनी हे यश मिळवले परिस्थितीला बाऊ न करता आलेल्या संकटांना सामोरे जात एकाच कुटुंबातील तीन बहिणी आणि एक भाऊ पोलीस दलात भरती झाले. गाव व परिसरात यामुळे या कुटुंबाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
परिस्थितीवर मात करत मुलांना शिकविले
कर्जत तालुक्यातील सुपा येथील रहिवासी असलेले अंकुशराव मोटे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जी थोडीफार शेती आहे ती दुष्काळी परिस्थितीमुळे निसर्गकृपेवर अवलंबून आहे. मोटे पती-पत्नीचे शिक्षण जेमतेम आहे. तीन मुली आणि एक मुलगा चौघेही लहानापासूनच अभ्यासात हुशार असल्याने मोटे आणि पत्नी कमलबाई मोटे यांनी मुलांच्या शिक्षणासाठी मोलमजुरी केली परिस्थितीवर मात करत त्यांना उच्चशिक्षित केले.
मुलगा- मुलगी असा भेदभाव न करता शिक्षणाला महत्त्व दिले म्हणून आम्ही यशस्वी झालो. आम्ही तिघी मुली असून आई-वडिलांनी आमच्यात आणि भावात कधी भेदभाव केला नाही. मुलांप्रमाणेच आम्हाला पण जिद्दीने शिकवले कर्जत सारख्या दुष्काळी भागात परिस्थिती नसताना आमच्या शिक्षणावर खर्च केला. स्वतःच्या पायावर आम्हाला उभे केले आणि आता लहान भाऊ देखील पोलीस दलात भरती झाल्यामुळे आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले याचाच आम्हाला भावंडांना मोठा आनंद आहे.
– रोहिणी मोटे
पोलिस शिपाई, मुंबई शहर पोलिस



