मुंबई विद्यापीठात ‘जमशेदजी टाटा- अनसंग हिरो ऑफ इंडियाज् फ्रिडम स्ट्रगल’ यावर राष्ट्रीय परिसंवाद आणि प्रदर्शन
मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – मुंबई विद्यापीठ आणि विज्ञान भारती यांच्या सयुंक्त विद्यमाने व संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या सहकार्याने ‘जमशेदजी टाटा- अनसंग हिरो ऑफ इंडियाज् फ्रिडम स्ट्रगल’ यावर मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय परिसंवाद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज ०७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल तथा कुलपती श्री. रमेश बैस यांच्या हस्ते होणार असून यावेळी पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेखर मांडे , प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, विज्ञान भारतीचे कोकण प्रांत अध्यक्ष प्रा. श्रीनिवास सामंत, कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड यांच्यासह उद्योग जगतातील अनेक मान्यवर आणि विविध संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विज्ञान भारती आणि संस्कृती मंत्रालयाच्या सयुंक्त विद्यमाने ‘भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वैज्ञानिक आणि वैज्ञानिक संस्थांची भूमिका’ यावर वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच उत्सवाचा एक भाग म्हणून ‘जमशेदजी टाटा- अनसंग हिरो ऑफ इंडियाज् फ्रिडम स्ट्रगल’ यावर राष्ट्रीय परिसंवाद आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या उदघाटन सत्रानंतर ‘इंडस्ट्रीलाईज, एनरिच अँड एम्पॉवर’ यावर समूह चर्चा आयोजित करण्यात आली आहे. या समुह चर्चेत श्री. भालचंद्रसिंह रावराणे, सीएमडी युसीपी इंडिया, युसीपी युरोप, डॉ. शिवप्रसाद खेनेड, सल्लागार, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय आणि डॉ. अरविंद रानडे, संचालक नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन, गांधीनगर हे सहभागी होणार आहेत. तर ‘एज्युकेट अँड इनोव्हेट’ या दुसऱ्या समुह चर्चेत डॉ. सुधाकर आगरकर, डीन, व्हीपीएम एकेडमी ऑफ इंटरनेशनल एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे, डॉ. श्रीनिवास शांरगपानी, कन्सलटन्ट, टाटा टेक्नॉलॉजीस, पुणे आणि स्वामी दयाधीपनंदा, रामकृष्ण मिशन हॉस्पीटल, मुंबई हे सहभागी होणार आहेत. टाटा आर्काइव्हच्या सहाय्याने जमशेदजी टाटा यांच्यावर ऑनलाईन प्रदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) कुलगुरू प्रा. ए. बी. पंडित हे उपस्थित राहणार आहेत. समारोप कार्यक्रमामध्ये साठे महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या हेरिटेज वॉकचे स्क्रीनींग आणि विज्ञान, वैज्ञानिक आणि जमशेदजी टाटा यांच्यावर आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रश्न मंजूषेतील विजेत्यांचा सत्कार केला जाणार आहे.



