खेड तालुक्यातील जैतापूर गावात भूस्खलन ; ढाणक वाडीतील तीन घरांना गंभीर धोका

खेड – कोकणात मागील काही दिवस महा अतिवृष्टी सुरू असुन यामुळे कोकणात ठिकठिकाणी भूस्खलन होत आहे. २७ जुलै रोजी खेड तालुक्यातील मौजे जैतापूर गावात भूस्खलन होऊन ढाणक वाडीतील अनुसया लक्ष्मण ढाणक,बाबू विठ्ठल ढाणक, लक्ष्मी बाबा ढाणक या तीन धनगर समाजाच्या कुटुंबांच्या घरांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. घरांच्या जवळच खालच्या बाजूला भूस्खलन झाल्यामुळे या घरांकडे जाणारी पायवाट बंद झाली आहे.
खेड तालुक्यातील कर्तव्यदक्ष तहसीलदार सुधीरजी सोनवणे साहेब यांना घटनेची माहिती मिळताच तातडीने धाव घेऊन दुर्घटनेची पाहणी केली. तातडीने ढाणक वाडीतील तीन कुटुंबांना स्थलांतरित करण्याचे आदेश देऊन त्यांची राहाणे व जेवणासाठी लागणा-या सर्व साहित्याची व्यवस्था केली आहे. सदर स्थलांतरित तीन कुटुंबांची राहाण्याची व्यवस्था मौजे जैतापूर येथे नवानगर येथे करण्यात आली आहे.ग्रामपंचायत मौजे जैतापूर चे उपसरपंच श्री कृष्णा लांबे यांचेही विशेष सहकार्य या कुटुंबांना मिळाले आहे.
महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी या संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे रत्नागिरी जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष डॉ विलास शेळके यांनी ही घटनास्थळी जाऊन आढावा घेतला असता या तीन कुटुंबांना पुन्हा आपल्या मुळ घरात जाण्याची भीती वाटत असुन आमच्या जीवाला धोका आहे अशी भावना व्यक्त केली आहे. शासनाने आमचे पुर्नवसन करून आम्हाला आधार द्यावा अशी मागणी ढाणक वाडीतील वरील तीन कुटुंबांनी शासनाकडे केली आहे. ग्रामस्थांच्या स्थलांतर करण्याच्या मागणीचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी सहकार्य करण्याचे अभिवचन समाजसेवक रामचंद्र आखाडे व डॉ. विलास शेळके यांनी ग्रामस्थांना दिले आहे.



