स्व. वसंतराव नाईक पुण्यतिथीनिमित्त कृषी योजना मेळावा सप्ताह

रत्नागिरी – स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त १८ ते २४ ऑगस्ट या कालावधीत कृषी योजना मेळावा सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण ५६ ठिकाणी कृषी योजना मेळावे आयोजित करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी दिली.
या मेळाव्यामध्ये पीएम किसान अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची अद्यापही ई केवायसी व बँक खाते ला आधार सीडिंग पूर्ण झालेले नाही अशा शेतकऱ्यांनी मेळाव्याच्या ठिकाणी आपला आधार कार्ड, आधार कार्ड ला संलग्न असलेला मोबाईल व बँकेचे पासबुक घेऊन जावे. तसेच पी एम किसान योजनेचा हप्ता का मिळत नाही याबाबत तपासणी करून मार्गदर्शन करण्यात येईल आणि एनपीसीआय मॅपिंग होत नसेल किंवा लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि ईकेवायसी पूर्ण झाले तरीही पीएम सन्मान निधीचा हप्ता मिळत नाही मिळत नसेल तर पोस्टामध्ये खाते उघडण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या मेळाव्यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनाबाबत सविस्तर माहिती येणार असून अर्ज करण्याची प्रक्रिया, त्याकरीता आवश्यक दस्तऐवज, अनुदानाचे स्वरूप व अनुषांगिक बाबी, संबंधित कार्यक्षेत्रामध्ये लागवड होणाऱ्या प्रमुख पिकांचे लागवड तंत्रज्ञान, पिकांच्या महत्त्वपूर्ण वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या कीड व रोग व त्यांचे नियंत्रण याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राजगिरा हे ऑगस्ट महिन्यातील Millete of the Month असल्याने त्याचे आहारातील महत्त्व याबाबत कृषी विज्ञान केंद्र यांच्या सहयोगाने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.



