रत्नागिरी विमानतळ पाहणी ; रत्नागिरीकरांचे स्वप्न सत्यात उतरणार – ना. उदय सामंत

रत्नागिरी – राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी विमानतळाच्या कामाची पाहणी केली. टर्मिनल बिल्डिंगचे काम सध्या ५०% पेक्षा जास्त पूर्ण झाले असून, सर्व अधिकारी व कंत्राटदारांसह चर्चा करून ३१ मार्चपर्यंत टर्मिनल बिल्डिंग आणि टॅक्सीवे काम पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री उदय सामंत यांनी दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरीकरांचे स्वप्न असलेल्या रत्नागिरी विमानतळावरून उड्डाणाचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. शेतकरी बांधवांची मुले,मुली शिक्षणासाठी किंवा उद्योगधंद्यासाठी मुंबईला कमी खर्चात प्रवास करू शकतील, हीच आपली संकल्पना प्रत्यक्षात उतरत आहे.
आगामी सहा महिन्यांत हे अत्याधुनिक विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज होईल. हा ऐतिहासिक क्षण देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावा, अशी विनंती मी केली असून लवकरच त्यासाठी स्वतः पंतप्रधानांची भेट घेणार आहे.
या विमानतळाच्या बांधकामात बांबू आणि लाकूड यांचा अभिनव वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे पर्यावरणपूरकता आणि ऑक्सिजन वाढ यासारख्या संकल्पनांना चालना मिळेल. महाराष्ट्रातील हे पहिले असे विमानतळ ठरणार आहे, जे इतर विमानतळांसाठीही आदर्श ठरेल, असे यावेळी बोलताना उदय सामंत यांनी म्हटले.



