रत्नागिरी जिल्ह्यात नशामुक्ती केंद्र सुरू करण्याबाबत समाज कल्याण अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात नशामुक्ती केंद्र सुरु करण्याबाबत पुढाकार घ्यावा, उपविभागीय अधिकाऱ्यांनी तडीपारसह अन्य प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे.
अंमली पदार्थ विरोधी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्याकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, निरीक्षक जनार्दन परबकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डाँ. संघमित्रा फुले आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी स्वागत करुन मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन करुन आढावा दिला.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले कि, उपविभागीय अधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्याल्यांमध्ये राबविलेल्या प्रचार, प्रसार, जनजागृती कार्यक्रमांचा अहवाल सादर करावा. गर्दीच्या ठिकाणी विशेषत: बस स्थानक, बाजारपेठ, प्रमुख चौकात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. कोस्टगार्डनेही किती बोटी तपासल्या याबाबतची माहिती द्यावी.
पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी म्हणाले कि, अन्न् व औषध निरीक्षकांच्या मदतीने पोलिसांनी एमआयडीसीमध्ये तपासणी केली आहे. अंमली पदार्थाचे उत्पादन होत असल्यास तात्काळ कळवावे. अशा सूचनाही लोटे एमआयडीसीमधील उद्योजकांच्या बैठकीत दिल्याचे सांगितले. पोलीसांनी केलेल्या सात प्रकरणात १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस उपअधीक्षक दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.



