आपला जिल्हा

नारी शक्ती वंदन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीने शिक्कामोर्तब ; रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील महीला पदाधिका-यांच्या विधेयकावर प्रतिक्रिया

संगमेश्वर – ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ कायद्यात रुपांतरीत झाल्याने राजकीय क्षेत्रातील महीलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेने केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ‘नारी शक्ती वंदन विधेयक २०२३’ संसद सदस्यांसमोर चर्चेसाठी मांडले. तब्बल २७ वर्षे प्रतिक्षा केल्यानंतर काही अपवाद वगळता दोन्ही सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्यांनी महिलांना ३३% आरक्षण मिळावे यासाठी मतदान केले. आणि अभूतपूर्व बहुमताने पास झालेले हे विधेयक देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले. शुक्रवार दि. २९ सप्टेंबर २०२३ हा ऐतिहासिक दिवस असून महामहीम राष्ट्रपती महोदयांनी विधेयकावर स्वाक्षरी केली यानंतर सरकारने नारी शक्ती वंदन कायद्याचे राजपत्र अधिसूचना जाहीर केली आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीत स्त्रियांचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीचा होता याबाबत अनेक उदाहरणे इतिहासाच्या पानांमध्ये आढळतील. मात्र सतत होणारी आक्रमणे आणि त्यातून महिलांवर होणारे अनन्वित अत्याचार यांतून स्त्रियांना तत्कालीन समाजव्यवस्थेने घराबाहेर पडण्यास बंदी घातली. याच पुढील काळात झालेला अतिरेक स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक स्त्रियांना भोगावा लागला. देशातील महिलांचा भाऊ बनून प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांनी स्त्रियांसाठी दिलेली ही ओवाळणी आहे. ही ओवाळणी देशातील तमाम माता-भगिनींना केवळ राजकीय प्रतिनिधित्वच नाही तर सामाजिक प्रतिष्ठाही लाभणार आहे. त्यामुळे दुबळी आता सबला होईल, सामान्य महिला असामान्य कर्तृत्त्व करण्यासाठी सज्ज होईल याबाबत तीळमात्र शंका नाही.

नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत पारीत झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय महीलांच्या या विधेयकावर प्रतिक्रिया

नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजुर झाले ही समस्त महीला वर्गासाठी अभिमानाची गोष्ट आहे, सामान्य कुटुंबातील महीलांना लोकसभा, विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्यासाठी ३३ टक्के आरक्षण मिळणार असल्याचा आनंद आहे. मात्र घराणेसाहीला बगल देवून महीलांना लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत प्राधान्य दिले तर विधेयकाचा हेतू सफल होईल या विधेयकाद्वारे मिळालेल्या संधीतून महीला आपल्या कामाचा ठसा लोकसभेत आणि विधानसभेत नक्कीच उमटवतील. नारी शक्ती वंदन विधेयकाची तातडीने अमंलबजावणी होईल या साठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने प्रयत्न करावेत.

– धनश्री शिंदे
माजी सभापती ( शिवसेना, उबाठा )
पंचायत समिती चिपळूण

महीला वंदना विधेयक मंजुर होते ही समस्त महीला वर्गासाठी अतिशय सन्मानाची गोष्ट आहे. आदरणीय पवार साहेबांनी महीलांमधील कार्यतत्परता, कुशलता पाहूनच प्रथम ३३ टक्के व नंतर ५० टक्के आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिले. त्यावेळेपासून राजकारणात सर्वच महीलांनी आपल्या कामाचा ठसा उपटला. सावित्रबाई फुले, आहील्याबाई होळकर अशा असामान्य व्यक्तीमत्वाच्या महीलांचा वसा जपणा-या पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्या खांद्यावा खांदा लावून काम करणा-या आम्हा समस्त महीलांसाठी अभिमानास्पद असलेले हे विधेयक आहे. आता लोकसभा, विधानसभा यासाठी ३३ टक्के आरक्षण हे महीलांना असेल गेल्या २८ वर्षांपासून रखडलेले हे विधेयक मंजुर केल्याबद्दल सरकारचे देखील मनपुर्वक आभार. आपल्या कर्तृत्वाचा ठसा विधानसभेत व लोकसभेत ही आम्ही असाच उमटवणार याची खात्री आहे.

– दिशा दाभोळकर
प्रदेश सरचिटणीस – राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य

महिला आरक्षण विधेयक आज लोकसभेत बहुमताने मंजूर झाले. याबद्दल आनंद झाला असून याचे स्वागत आहे. हे विधेयक आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार. या विधेयकामुळे महिलांना आता ३३ टक्के आरक्षण असणार आहे. याचा फायदा राजकारणात येवू पाहणाऱ्या महिलांना होणार आहे.

– रश्मी कदम
रत्नागिरी जिल्हाध्यक्षा- भाजप महिला मोर्चा

नारी तू नारायणी
राष्ट्रगौरव पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ लोकसभेत ऐतिहासिक बहुमताने संमत झाले अखेर या विधेयकावर महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी करत शिक्कामोर्तब केले.सरकार आणि विरोधकांनी एकत्र येऊन हे विधेयक मंजूर करून देशाच्या नारी शक्तीला ऊर्जा देण्याचे काम केल्याबद्दल मनस्वी अभिनंदन!
नारी शक्तीचा विजय असो…

-उल्का विश्वासराव
भाजप नेत्या, राजापुर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक सह-प्रमुख.

हिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. याचे स्वागतच आहे. परंतु स्थानिक पातळीवरील राजकारण वेगळे असते. त्यामुळे या विधेयकाचा महिलांना कितपत फायदा होईल याबाबत साशंकता आहे.

– दुर्वा वेल्हाळ
संगमेश्वर तालुकाध्यक्षा- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट )

महिला आरक्षण ही महीलांसाठी खुप चांगली बाब आहे पण ज्या प्रमाणे कायदे करुनही महिलांवर अत्याचार होत आहेत कायदे होतात त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेची आहे. आरक्षणाचा लाभ घरणेशाही मध्ये न होता समाजातील सर्व सामान्य महिलांना ही झाला पाहीजे सर्व सामान्य कुटुंबातील महीला घराणेशाहीला बगल देवून आमदार, खासदार झाल्या पाहीजेत तरच महीला आरक्षण विघेयकाचा हेतू सफल होईल

– निधा इस्तियाक कापडी
माजी नगरसेविका ( शिवसेना, उबाठा ) , देवरुख नगरपंचायत

Related Articles

Leave a Reply

Back to top button