एलएलएमच्या प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – मुंबई विद्यापीठाकडून राबविण्यात येत असलेल्या एलएलएम अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया १५ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत होती. मात्र एलएलबीच्या ७६४ विद्यार्थ्यांचे पुर्नमुल्यांकनाचे निकाल प्रलंबित आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात अडचण येत आहे. यासंदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे अनेक विद्यार्थ्यांनी तक्रार केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबई विद्यापीठाचे शिवसेनेचे माजी सिनेट सदस्य ॲड. वैभव थोरात यांनी पत्राद्वारे मुंबई विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली. याची दखल घेत मुंबई विद्यापीठाने एलएलएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया मागील काही दिवसांपासून सुरू असून, ती १५ सप्टेंबरला संपुष्टात येणार होती. मात्र एलएलबीच्या जवळपास १७२२ पैकी ७६४ विद्यार्थ्यांचे पुर्नमुल्यांकन परीक्षेचे निकाल परीक्षा विभागाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी एलएलएम प्रवेशापासून वंचित राहून, त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. यासंदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे अनेक विद्यार्थ्यांनी तक्रार केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य ॲड. वैभव थोरात यांनी कुलगुरू डॉ. रवींद्र कुळकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे ही समस्या मांडली. तसेच पुर्नमुल्यांकनचे निकाल जाहीर होईपर्यंत एलएलएम अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया वाढविण्याची विनंती केली होती. याची तातडीने दखल घेत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी एलएलएम अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे परिपत्रक काढले. तसेच पुर्नमुल्यांकनाचे सर्व निकाल ३० सप्टेंबरपूर्वी जाहीर करण्यात येतील, असे आश्वासन कुलगुरूंनी दिल्याची माहिती ॲड. वैभव थोरात यांनी दिली.



