आपला जिल्हाताज्या घडामोडी

आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक; आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर मारल्या उड्या

मुंबई- आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आज मंत्रालयात जाऊन जोरदार आंदोलन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. दरम्यान पोलिसांनी सुरक्षा जाळीवर उतरून या आंदोलकांना बाहेर काढलं आहे. यावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

धनगर समाजाला आदिवासी समाजाचा दर्जा द्यावा आणि आदिवासींच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाकडून केली जाते आहे. त्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणी उपोषणदेखील सुरू आहे. मात्र, राज्य सरकार आपल्या आंदोलनाकडे लक्ष देत नाही, असा आरोप या आंदोलकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करणाऱ्या धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी आज थेट मंत्रालयात पोहोचून आपल्या मागण्याचे निवेदन सरकारला देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकार आपले निवेदन स्वीकारत नाही, असा आरोप करत त्यांनी मंत्रायलात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या मजल्यावरून थेट सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

अखेर पोलिसांनी या सुरक्षा जाळीवर उतरून आंदोलकांना बाहेर काढलं. यावेळी या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. या आंदोलकांना आता पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. धनगर समाजाच्या या आंदोलनावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यांनंतर आता धनगर आरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी मंत्रालयातील जाळ्यावर उड्या मारल्या आहेत. महायुती सरकारने महाराष्ट्रातील विविध समाजात किती अस्वस्थता निर्माण केली आहे, याचे हे चित्र आहे. महायुतीने महाराष्ट्राच्या मंत्रालयाची सर्कस करून ठेवली आहे. एका मागून एक आंदोलन होत आहे. पण सरकार अजूनही निष्क्रिय आहे, असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button